दैनिक भ्रमर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी लाल किल्ल्यावरुन नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मोदी सरकारने देशभरात 3 कोटी महिलांना लखपती करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यातील 2 कोटी महिला लखपती झाल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. लखपती दीदीने मोठा रेकॉर्ड केल्याचे सूतोवाच त्यांनी केले. पंतप्रधानांनी लवकरच पुढील उद्दिष्ट पण गाठण्यात येईल असे स्पष्ट केले.
लखपती दीदी योजना काय?
मोदी सरकारने १५ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. आता त्याला दोन वर्षे उलटली आहे. महिलांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी ही योजना आहे. काही राज्यात ही योजना या घोषणेपूर्वीच राबवण्यात येत होती. देशात आता दोन कोटी महिला या लखपती झाल्याची घोषणा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केली. या योजनेत महिलांना सुक्ष्म कर्ज पुरवठा करण्यात येतो. महिलांना उद्योग, शिक्षण आणि इतर गरजांसाठी अल्प कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेत तारण काही ठेवावे लागत नाही.लखपती दीदी योजना केवळ कर्ज पुरवठा करत नाही तर महिलांना कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण ही देण्यात येते.