दैनिक भ्रमर : काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडच्या धराली इथं झालेल्या ढगफुटीनं देश हादरलेला असतानाच या नैसर्गिक आपत्तीच्या आघातातून नागरिक सावरत नाहीत, तोच देशाच्या आणखी एका राज्याला ढगफुटीचा तडाखा बसला आहे.
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील पद्दार ताशोती भागात ढगफुटीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीमुळे ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय १२० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले असून अनेकजण अडकल्याचे म्हटले जात आहे. सध्या बचावकार्य वेगाने सुरु असून लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
श्रीनगरच्या हवामान विभागाने पुढील ४ ते ६ तासांत जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे. मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह, सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा श्रीनगर हवामान केंद्राने दिला आहे. पूरपरिस्थितीमुळे लंगरची शेड वाहून गेल्याने किमान १२ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनीही सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. 'जम्मू-काश्मीरच्या किश्तवारमधील ढगफुटी आणि पुरग्रस्तांबरोबर माझ्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. गरजूंना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टमार्फत म्हटले आहे.