राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. मेघालयचे पोलीस प्रमुख इदाशिशा नोंगरांग यांनी या हत्येमागे प्रेमाचा त्रिकोण ही एकमेव गोष्ट नसावी असा अंदाज व्यक्त केला आहे.
सोहरा येथील इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशीच्या हत्येचा तपास करणारे प्रेम त्रिकोण हे एकमेव कारण मानत नसून, इतर दृष्टीकोनातूनही तपास केला जात आहे असं इदाशिशा नोंगरांग यांनी सांगितलं आहे.
राजा रघुवंशीची हनिमूनला गेला असताना 23 मे रोजी मेघालयात हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी पत्नी सोनम, तिचा प्रियकर राज आणि इतर तीन आरोपींना अटक केली आहे. 9 जूनला पोलिसांनी अटकेची कारवाई केली.
"आरोपींनी हत्येचा जो हेतू सांगितला तो मला पटण कठीण जात होतं. त्यांनी सांगितलेली कारणंही पटत नव्हती. आम्ही यामध्ये अतिरिक्त काही आहे का, हे पाहत आहोत. एखादी व्यक्ती लग्नाच्या काही दिवसांतच इतका द्वेष निर्माण करेल की, तुम्ही त्या व्यक्तीला मारण्याचा कट रचता यावर विश्वास ठेवणं मला खूप कठीण जाते. वरवर पाहता, हा एक प्रेम त्रिकोण दिसतो, परंतु वैयक्तिकरित्या मला विश्वास बसणार नाही की हा एकमेव हेतू आहे," असं इदाशिशा नोंगरांग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.
त्यांनी सध्या तपास पुढे जात असून, सर्व धागेदोरे एकत्र केले जात असल्याची माहिती दिली. तसंच पोलीस वेळेत चार्जशीट दाखल करण्यासाठी प्रयत्न करत असून, आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
"तपास सध्या सुरू आहे. अनेक गोष्टी एकत्र करत भक्कम पुरावे गोळे केले जात आहेत. तपास निर्दोष व्हावा आणि आमच्याकडे एक अतिशय ठोस केस असावी यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडत नाही आहोत. आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत आणि आम्ही दिलेल्या वेळेत केस चार्जशीट करण्यासाठी काम करत आहोत," असं त्या पुढे म्हणाल्या.
सोनम (25) आणि राजा रघुवंशी (29) यांचे लग्न 11 मे रोजी इंदूर येथे झाले होते आणि 21 मे रोजी ते आसाममधील गुवाहाटी मार्गे मेघालयात हनिमूनसाठी गेले होते. 23 मे रोजी, मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा येथे दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. 2 जून रोजी वेइसावडोंग फॉल्सजवळील एका खोल दरीत राजाचा कुजलेला मृतदेह आढळला. 9 जूनच्या पहाटे सुमारे 1200 किमी अंतरावर उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे दिसलेल्या सोनमसाठी शोध मोहीम सुरू होती. हत्येप्रकरणी तिचा प्रियकर आणि तीन सुपारी किलर यांना अटक करण्यात आली त्याच दिवशी तिने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.