जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात अजबच घटना घडली आहे. ज्यामुळे संपूर्ण कुटुंबासोबत गावकऱ्यांनाही सुखद धक्का बसला आहे.
या गावातील रघुनाथ खैरनार हे आजोबा बेपत्ता झाले होते. अशातच त्यांच्या कुटुंबाने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु ते सापडले नाहीत. त्याचवेळी पाळधी गावात असणाऱ्या रेल्वे ट्रॅक जवळ एक अनोळखी मृतदेह आढळला. हा मृतदेह खैरनार यांचाच आहे का यासाठी स्थानिक रेल्वे गार्ड व इतर व्यक्तींकडून खैरनार कुटुंबाशी संपर्क केला गेला, खैरनार कुटुंबानेही घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली.
मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवला गेला. हे सुरु असतानाच इकडे गावात रघुनाथ खैरनार यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली गेली. त्यांचा मृत्यू झाल्याचेही सर्व नातेवाईकांना कळवण्यात आले. पाळधी गावात त्यांच्या अंत्यासंस्कारासाठी नातेवाईक जमले आणि त्याच वेळी रघुनाथ खैरनार हे चक्क पायी चालत आपल्या घरी आले. हे दृश्य पाहून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना एकच धक्का बसला.
मग तो मृतदेह कोणाचा ?
पाळधी गावात असणाऱ्या रेल्वे ट्रॅक जवळ आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवताना झालेल्या गफलतीमुळे हा सर्व गोंधळ झाला. रेल्वे ट्रॅक जवळ आढळलेला मृतदेह आणि रघुनाथ खैरनार यांच्या चेहऱ्यात असलेले साम्य, सारखेच कपडे आणि हात देखील सारखेच असल्यामुळे गोंधण उडाला. यामुळे हा मृतदेह रघुनाथ खैरनार यांचाच आहे असा समज खैरनार कुटुंबियांचा होता. मात्र रघुनाथ खैरनार हे स्वतः पाई चालत घरी आल्याने शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला तो मृतदेह नेमका कोणाचा? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सध्या या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, रघुनाथ खैरनार यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याने ते अनेकदा घरातून निघून जातात. याआधी देखील ते अनेकदा निघून गेले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. सध्या रेल्वे ट्रॅक जवळ आढळलेला मृतदेह कोणाचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.