२५ एप्रिल २०२६
उष्णता वढल्याने त्या पाढोपाठ उष्माघाताच्या घटनांमध्ये ही वाढ होत आहे. लातुर जिल्ह्यात तर वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या घटनांत आधिवाढ झाल्याचे दिसून येत आहे.
उष्णतेमुळे लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यात ९ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे.
औसा तालुक्यातील गोंद्री गावात नऊ महिन्यांच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून दुपारच्या सुमारास तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे.
तीव्र उन्हामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी वर्ग यांना उष्माघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
वाढत्या उष्णतेचा परिणाम
सतत वाढणाऱ्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेषतः ग्रामीण भागात दुपारच्या वेळेत काम करणाऱ्या नागरिकांवर याचा अधिक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.चार दिवसांपूर्वी औराद शहाजनी येथे 60 वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता गोंद्री येथील बाळाच्या मृत्यूची घटना समोर आल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे.
आरोग्य विभागाचे आवाहन
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कामांशिवाय दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे, हलके आणि सैल कपडे परिधान करावेत, तसेच लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
अहिल्यानगरमध्ये उष्माघाताचा बळी
अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील जिल्हा परिषद शिक्षिका उषा फापाळे या 50 वर्षीय महिलेचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
उषा फापाळे या दररोजप्रमाणे सकाळी गारगुंडी येथून दुचाकीवरून पिंपळगाव रोठा येथे शाळेत गेल्या होत्या. सध्या शाळा सकाळी भरत असल्याने दुपारी बारा वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर त्या प्रखर उन्हातच परतीच्या प्रवासाला निघाल्या.
घरी पोहोचल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. अंगात अशक्तपणा, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागल्याने त्यांना तातडीने कान्हूर पठार येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या अगोदर ढवळपुरी येथील माळवडीमधील महिलेचा शेतात काम करताना मृत्यू झाला आहे.
Copyright ©2026 Bhramar