जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या काळात पक्षतारांला वेग आला असताना भाजपनं मात्र २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केलीय. महानगरपालिका निवडणुकीत महायुती उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी केल्यामुळे भाजपने माजी नगरसेवकांसह काही पदाधिकारी अशा एकूण २७ जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
जळगाव महानगरपालिकेत युतीधर्म न पाळणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या बंडखोरांवर पक्षातर्फे कारवाई करण्यात आली आहे.पक्षशिस्तभंग केली म्हणून या कार्यकर्त्याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पक्षाच्या धोरणे, निर्णय व संघटनात्मक शिस्त न पाळता पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत असल्याचा ठपका ठेवला आहे. या संदर्भात झालेल्या पक्षाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असून, तो पक्षहित व संघटनात्मक शिस्त लक्षात घेऊन घेतल्याचे भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
हकालपट्टी झालेल्या भाजप पदाधिका-यांमध्ये ५ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. त्यात माजी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, हर्षदा अमोल सांगोरे, रंजना भरत सपकाळे, कांचन विकास सोनवणे, चेतना किशोर चौधरी यांचा समावेश आहे. त्यासोबतच हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये गिरीष कैलास भोळे धनश्री गणेश बाविस्कर, गणेश दत्तात्रय बाविस्कर, प्रमोद शातांराम शिंपी, भरत शंकर सपकाळे, हिरकणी जितेंद्र बागरे, ज्योती विठ्ठल पाटील, मयूर श्रावण बारी, तृप्ती पाडुरंग पाटील, सुनिल ज्ञानेश्वर पाटील, विकास प्रल्हाद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
भाजपात बड्या नेत्यांची , कार्यकर्त्यांची जोरदार इनकमिंग सुरु असताना भाजपकडून करण्यात आलेल्या या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.