राज्यातील २९ महापालिकेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. पण पहिल्या तासातच कुठे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले तर कुठे दुबार मतदार मिळून आलाय. त्याशिवाय मतदार यादीत देखील घोळ झाल्याचे समोर आले आहे. मतदार यादीत मंत्र्यांचेच नाव नसल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीय.
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचेच नाव मतदार यादीत नसल्याचे समोर आले होते. या प्रकारानंतर गणेश नाईक यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. नाईक मतदान करण्यासाठी गेले असता, मतदार यादीमध्ये त्यांचे नावच नव्हते. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवली गेल्याची माहितीही उघड झाली आहे. मंत्री गणेश नाईक यांना मतदानासाठी या केंद्रावरून त्या केंद्रावर फिरावे लागले आहे.
गणेश नाईक यांनी सांगितले की, ते सामान्यतः नवी मुंबई महापालिकेच्या शाळा क्रमांक ९४ मध्ये मतदान करतात. परंतु, यावेळी त्यांना सेंट मेरी शाळेत मतदान केंद्र असल्याचे सांगण्यात आले. तिथे गेल्यावर त्यांना रूम नंबर ९ सापडला नाही आणि नंतर रूम नंबर ९ जरी असला तरी यादीत त्यांचे नाव नव्हते. यानंतर ते पुन्हा सेंट मेरी शाळेत जाण्यासाठी निघाले. आमदार आणि राज्याचे मंत्री असूनही आपल्यासोबत असा प्रकार घडत असेल, तर सामान्य मतदारांचे काय होणार, असा प्रश्न नाईकांनी उपस्थित केला आहे.
हे नियोजन व्यवस्थित नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असे त्यांनी म्हटले आहे. एकाच इमारतीत राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे तीन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवली गेली आहेत, ज्यामुळे मतदानातील त्रुटींवर प्रकाश पडला आहे.