राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणूकांचे मतदान सुरू आहे. दरम्यान EVM मशीन असो किंवा दुबार मतदान असो यामुळे अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं देखील पाहायला मिळालं. अशातच काही मतदारांनी बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे महापालिका निवडणूक वादाच्या भोवऱ्यात आली आहे.
त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले आहे की, बोटाला मार्करद्वारे लावत असलेली शाई एकदा सुकली की ती निघू शकत नाही. ज्या लोकांनी शाई पुसण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी काय वापरलं हे आम्हाला माहिती नाही.
यावर पत्रकारांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मार्करचा वापर करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना वाघमारे यांनी, ‘मार्कर पेनचा अनुभव पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही इंडिलेबल इंकचा वापर करणार आहोत.’ अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता ५ फेब्रुवारीला मार्करऐवजी काडीने बोटाला शाई लावली जाणार आहे.