राज्यात २९ महापालिकांसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली आहे. दरम्यान काही ठिकाणी EVM मशीन बंद पडल्या होत्या , नंतर त्या सुरळीतही करण्यात आल्या. आता महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी जी शाई वापरली जात आहे ती पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे. शाई निघत असल्याचा आरोप राज्य निवडणूक आयुक्तांनी फेटाळून लावला आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, “केंद्रीय निवडणूक आयोग जी शाई वापरतोय, तीच शाई आम्ही वापरतोय. ही शाई काढता येत नाही”. एकदा मतदान करुन गेल्यानंतर पुन्हा मतदान करण्यासाठी एखादा आला, तर मतदान केंद्र अधिकारी त्यावर नक्कीच कारवाई करेल.
“बोटावरची मतदानाची शाई पुसली जातेय हा संभ्रम पसरवला जात आहे. ही शाई आम्ही 2011 पासून वापरतोय. मार्कर पेन वापरतोय. याच निवडणुकीत अशाच प्रकारचा संभ्रम पसवरणं चुकीच आहे. लोकसभा, विधानसभेच्यावेळी सुद्धा अशाच प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. शाई ड्राय झाल्यानंतर पुसली जात नाही. 2011 पासून आम्ही एकाच कंपनीचं मार्कर पेन वापरत आहोत.कोरस कंपनीच मार्कर पेन वापरत नाहीय” असंही दिनेश वाघमारे म्हणाले.
“माझ्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी मतदान केलेलं आहे. त्यांची शाई टिकून आहे. पुसली गेलेली नाही”. “दुबार मतदारांच्या बाबतीत त्यांची ओळख पटवल्याशिवाय त्यांना मतदान करुन दिलं जात नाही. मुंबईत तर दोन ओळखपत्र मागितली जात आहेत. त्याशिवाय उमेदवारांचे प्रतिनिधी मतदान केंद्रात आहेत. ते त्याच मतदारसंघातले आहेत” असं दिनेश वाघमारे दुबार मतदानाच्या मुद्यावर म्हणाले.
'मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश जारी करण्यात आले होते. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जातोय. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने लावण्यात यावी. तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना याआधी देण्यात आल्यात. त्या मार्कर पेनवरही नमूद केल्यात. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन आयोगाने केले आहे.