महापालिका निवडणुकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. उद्या म्हणजे १५ जानेवारीला मनपा निवडणुकांसाठी मतदान आहे. मुंबई वगळता राज्यातील २९ पैकी २८ महानगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहेत. अनेक नागरिकांकडे मतदार ओळखपत्र नाही किंवा हरवले आहे अशा मतदारांसाठी निवडणूक आयोगाने मोठी सवलत दिली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) नियमांनुसार, मतदान करण्यासाठी तुमच्याकडे 'इलेक्ट्रॉनिक फोटो ओळखपत्र' (EPIC) असणे उत्तम, पण ते नसल्यास घाबरण्याचे कारण नाही. मतदानासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अधिकृत मतदार यादीत तुमचे नाव असणे. जर तुमचे नाव यादीत असेल, तर तुम्ही मतदान केंद्रावर निवडणूक स्लिप आणि त्यासोबत अन्य अधिकृत ओळखपत्र दाखवून मतदान करू शकता.
जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तर खालीलपैकी कोणतेही एक सरकारमान्य ओळखपत्र दाखवून तुम्ही मतदान केंद्रात प्रवेश मिळवू शकता.यामध्ये,
आधार कार्ड
पॅन कार्ड (PAN Card)
ड्रायव्हिंग लायसन्स
पासपोर्ट
मनरेगा जॉब कार्ड
फोटो असलेले पेन्शन कार्ड
कामगार मंत्रालयाने जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी ओळखपत्र
बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटोसह पासबुक
महत्त्वाचे म्हणजे केवळ 'व्होटर स्लिप' असून चालणार नाही, त्यासोबत वरीलपैकी एक फोटो असलेले ओळखपत्र असणे ओळख पटवण्यासाठी आवश्यक आहे.
मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार, कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र सरकारची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, शैक्षणिक तत्सम आस्थापनांनाही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
या शासन निर्णयानुसार, निवडणूक क्षेत्रात तसेच क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या सर्व कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश आस्थापनांना देण्यात आले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल, निवासस्थाने, आयटी कंपन्या, मॉल, शॉपिंग सेंटर, किरकोळ विक्रेते आदींना हे आदेश लागू राहणार आहेत.