उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. झांसी येथे ३० वर्षीय रवींद्र अहिरवार याचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिप्री बाजार पोलीस स्टेशन परिसरातील जीआयसी मैदानावर ही हृदयद्रावक घटना घडली. रवींद्र झांसी येथील एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून काम करत होता.
नेमकं काय घडलं ?
रवींद्र सकाळी मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेला. संघातील खेळाडूंनी दिलेल्या माहितीनुसार, तो बॉलिंग करत असताना त्याला तहान लागली म्हणून तो पाणी प्यायला. पाणी पिताच त्याला त्याला अचानक उलट्या झाल्या आणि बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. यानंतर उपचारासाठी त्याला ताबडतोब झांसी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं.
रवींद्रच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार रवींद्र पूर्णपणे निरोगी होता. रवींद्र दोन वर्षांपूर्वी एलआयसीमध्ये विकास अधिकारी झाला होता. आमचं कुटुंब खूप आनंदी होतं. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, खेळताना तो अचानक आजारी पडला आणि काही मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला.
झाशी मेडिकल कॉलेजचे सीएमएस डॉ. सचिन माहोर यांनी सांगितलं की, तरुणाला रुग्णालयात आणलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. खेळताना किंवा व्यायाम करताना अचानक जास्त पाणी प्यायल्याने देखील ही समस्या उद्भवू शकते, असंही त्यांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.