"माझी मुलगी तर गेली, तिच्या चारित्र्यावर..."; वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर ; नेमकं काय म्हणाले...
img
Dipali Ghadwaje
पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी बुधवारी न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी, पुणे न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.

मात्र, या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना हगवणेंच्या वकिलांनी खळबळजनक दावे करत वैष्णवीच्या चारित्र्यावरच शंका उपस्थित केल्या आहेत. तसेच, तिचे एका अज्ञात व्यक्तीसोबत चॅटींग सुरू होते, त्यातूनच हा वाद झाला असून त्यातच तिने आत्महत्या केल्याचं हगवणेंच्या वकिलांनी म्हटलं.

त्यानंतर, पुन्हा एकदा हगवणे कुटुंबीयांबद्दल संताप व्यक्त होत आहे. वैष्णवीचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका या वकील महोदयांवर होत आहे. त्यातच, आता वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, माझी मुलगी तर गेली, आता तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, अशी कळकळीची विनंती वैष्णवीच्या वडिलांनी हात जोडून केली. 


हुंड्यासाठी छळ केला नाही म्हणता, गाडी मागितली नाही म्हणता. पण, हगवणेंना फॉर्च्यूनर देण्याअगोदर मी एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती. मात्र, त्यांनी वादावादी केली, मला फॉर्च्युनर नाही दिली तर मी यांची हेक्टर पेटवून देईन, असं सांगण्यात आलं.

त्यामुळे, आम्ही फॉर्च्युनर दिल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं. आरोपीकडे 5 कोटींच्या गाड्या नाहीत, त्याच्याकडे एकच गाडी आहे तीही मी दिलेली. माझ्या मुलीची अगोदरच दोन लग्न मोडली होती, गाडी न दिल्यास लग्न मोडण्याची धमकी दिल्यामुळे मी फॉर्च्युनर दिली.

माझ्याकडे गाडी, चांदीच्या ताटाची मागणी, सोन्याची मागणी तसेच अधिक महिन्यात इतरही मागण्या करण्यात आल्या. माझ्या मुलीचे दोन लग्न मोडली त्याला हगवणे कुटुंब जबाबदार आहेत, असेही वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांनी म्हटले. दरम्यान, आरोपी निलेश चव्हाण देखील या कटात सहभागी होता, त्यावेळी तो ही तिथं होता.

वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर

वकील असे बोलतात ही हास्यास्पद गोष्ट आहे,चार चापटा मारणे म्हणजे गुन्हा नाही हे वाईट आहे. वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी 5 ते 6 दिवस सातत्याने हगवणे कुटुंब तिला मारहाण करत होते. माझी मुलगी तर आता गेलीय, वैष्णवीवर आता काहीही आरोप करुन शिंतोडे उडवू नका, अशी हात जोडून विनंती वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषदेतून केली. पत्रकार परिषदेत वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते. तुम्हाला ही मुली असतील, तुम्ही सर्वांनी हा विचार करावा, अशी कळकळीची विनंती त्यांनी भरल्या डोळ्यांनी आणि हात जोडून केली आहे. 


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group