मनमाड (नैवेद्या बिदरी) :- शहर परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर होत असल्याची चर्चा असतानाच शहरापासून जवळ असलेल्या रायपूर भडाणे येथील एका शेतकऱ्यावर गुरुवारी रात्री बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.
या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मनमाड शहरापासून जवळ असलेल्या लासलगाव रोडवरील रायपूर भडाणे या गावातील रामदास सिताराम आहेर हे गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास शेतीतील कामे आटोपून घरी येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या वर हल्ला चढविला आणि यात त्यांच्या शरीराचे लचके तोडून त्यांना गंभीर जखमी केले.
बिबट्याने त्यानंतर धूम ठोकली आहे. मात्र आता या भागात बिबटया मुक्त संचार करत असुन आता तो नरभक्षक झाला असल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.