नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- केशरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसाठी शासकीय योजनेनुसार वितरण करण्यासाठी देण्यात आलेल्या ३३ क्विंटल गहू व ५० क्विंटल तांदूळ असा एकूण ८३ क्विंटल धान्याचे वाटप न करता त्याचा अपहार करणार्या दोन रेशन दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विलास पार्वता लक्ष्मण कनोजे (रा. विवेकानंदनगर, मखमलाबाद, नाशिक) हे शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आरोपी अमोल दिगंबर सदावर्ते (रा. रंगुबाई जुन्नरे शाळेजवळ, द्वारका) व मुकुंद सुभाष पाटकर (रा. शिवाजीनगर, गांधीनगर, नाशिक) यांचे चौक मंडई येथील ६९ क्रमांकाचे स्वस्त धान्य दुकान आहे.
आरोपी सदावर्ते व पाटकर यांनी संगनमत करून त्यांच्या दुकानात केशरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या योजनेनुसार वितरित करण्यासाठी धान्य देण्यात आले होते.
त्या धान्यापायी ३३ क्विंटल ४९ किलो गहू व ४९ क्विंटल ९१ किलो तांदूळ असे एकूण ८३ क्विंटल ४० किलो धान्य गरजू शिधापत्रिकाधारकांना वितरित न करता त्याचा अपहार करून शिधापत्रिकाधारकांची आणि शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अमोल सदावर्ते व मुकुंद पाटकर या रेशन दुकानदारांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक वाय. एस. माळी हे करीत आहेत.