संसदेत सोमवारपासून (ता. 28 जुलै) पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत चर्चा सुरू आहे, त्या चर्चेत सहभागी झालेल्या सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून तर देशभक्तीचे वाटते. पण सरकारने माध्यमांमध्ये केलेला तो एक तमाशा होता,’ असे विधान केले होते. या विधानावरून प्रणिती शिंदेसह काँग्रेसचा चांगलाच समाचार नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसच्या एक नवख्या खासदार....त्यांना आपण माफ केलं पाहिजे; कारण नवख्या खासदारास काय म्हणायचे? पण काँग्रेसचे आका त्यांना लिहून देतात, त्यांच्याकडून वदवून घेतात. कारण, काँग्रेसच्या आकामध्ये हिम्मत नाही.
नवख्या सदस्यांकडून काँग्रेसचे आका वदवून घेतात की, ऑपेरशन सिंदूर हा तर तमाशा होता. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या २६ लोकांना मारलं, त्या भयंकर घटनेवर ॲसिड टाकण्यासारखे हे पाप आहे. तमाशा म्हणता. तुमची असहमती असू शकते. पण, काँग्रेस पक्षाचे लोक असं वदवून घेतात, असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केला.