धरणांतुन पाण्याचा विसर्ग; बरीच गावे संपर्काबाहेर, जुन्या कसारा घाटात दरडही कोसळली
धरणांतुन पाण्याचा विसर्ग; बरीच गावे संपर्काबाहेर, जुन्या कसारा घाटात दरडही कोसळली
img
दैनिक भ्रमर

 इगतपुरी - इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

तालुक्यातील सर्वात मोठे दारणा धरण ९१.७२ टक्के भरले असून, त्याचे सहा दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले आहेत. सध्या १० हजार २८४ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण आणि नदीपात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संततधार पावसामुळे भावली धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता आहे. काही पूलांवर एक फूट पाणी वाहण्याचा धोका असल्याने पर्यटकांनी या भागात येणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मंगळवारी तालुक्यात इगतपुरी १६६ मिमी, वाडीवऱ्हे ५२ मिमी, धारगाव १२० मिमी, टाकेद बुद्रुक ६७ मिमी, घोटी बुद्रुक ११० मिमी, नांदगाव बुद्रुक ४९ मिमी अशी एकूण ५६४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे काही आदिवासी पाड्यांचा शहराशी संपर्क तुटला आहे तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे.

इगतपुरी नपा हद्धीतील वाघाचा झाप, मेंगाळ झाप आणि कातोरे वस्ती येथील रस्ते पाण्याखाली गेल्याने या आदिवासी पाड्यांचा शहराशी संपर्क तुटला आहे. यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मात्र प्रशासनाने अद्यापही शाळांना सुट्टी जाहीर केलेली नाही. याबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

इगतपुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी नागरिकांना महत्त्वाची सूचना जारी केली आहे. त्या म्हणाल्या की, “काल रात्रीपासून पावसाने उसंत घेतलेली नाही. नद्या आणि नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे शाळा-कॉलेज, कंपन्या, शेती आणि दैनंदिन व्यवहारात वावरणाऱ्या विद्यार्थी, कामगार, शेतकरी, नागरिक आणि व्यापारी वर्गाने काळजीपूर्वक आणि जबाबदारीने वागावे.

कोणतीही अडचण उद्भवल्यास स्थानिक पोलीस स्टेशन, इगतपुरी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष, इगतपुरी नगरपंचायत आपत्कालीन कक्ष, घोटी, कसारा, वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन किंवा आपत्ती व्यवस्थापन टीमशी संपर्क साधावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.”

प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाची तीव्रता आणि धरणातील पाण्याचा विसर्ग यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. पाणी साचलेल्या रस्त्यांमुळे वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत दरड बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली असून अप मार्गाची जनशताब्दी व धुळे एक्सप्रेस रद्द केल्या आहेत. लांब पल्याच्या गाड्या काही वेळ उशिराने धावत असून तर काही गाड्यांचे केले री शेड्युल केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group