राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वारे जोरदार वाहू लागले आहेत. सर्वच इच्छुकांच्या नजरा या निवडणुकांमध्ये लागल्या आहेत. आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ३१ जानेवारी २०२६ च्या आतमध्ये राज्यातील निवडणुका घेण्यासाठी आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

पंचायत समिती आणि नगर परिषदेचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून लवकरच मनपाचेही आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्याबाबतच संभाव्य तारीख समोर आली आहे. त्याशिवाय शिक्षकांची इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे, त्यानुसार निवडणुकीच्या तारखांचा अंदाज वर्तवला जातोय. राज्यातील शिक्षकांची जानेवारीपर्यंत इलेक्शन ड्युटी लावल्याचे समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दिवाळीनंतर २७ ते ३१ ऑक्टोबर यादरम्यान आयोगाकडून पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे. नोव्हेंबर अखेर अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होऊ शकते. तर दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर परिषदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.