मुंबईत विरोधकांनी आयोजित केलेल्या सत्याच्या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले. या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तसेच अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या मोर्चाच्या माध्यमातून मतदारयाद्या स्वच्छ करा, दुबार मतदारांची नावे हटवा, या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. राज ठाकरे यांनीदेखील जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी सत्ताधारी महायुतीवर सडकून टीका केली. मतदार याद्यांतील घोळ संपवल्याशीवाय निवडणुका घेऊ नका, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे काय म्हणाले ?
सगळे बोलत आहेत दुबार मतदार आहेत. आम्ही बोलतोय, भाजपचे लोक बोलताय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील लोक बोलताय...मग निवडणुका घ्यायची घाई का? मतदार याद्या साफ करा, पारदर्शक याद्या केल्यावर यश-अपयश कोणाचं, हे स्पष्ट होईल. आज मी इकडे पुरावा घेऊन आलो आहे. दुबार मतदारांना घेऊन आलोय, असं म्हणत राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या याद्यांच्या कागदपत्रांचा डोंगर दाखवला.
यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार देखील पाहात बसले. राज ठाकरेंनी सभेसाठी उपस्थित असलेल्या माणसांमध्ये दुबार मतदारांच्या याद्यांची कागदपत्रं ठेवली होती. ही सर्व दुबार मतदार आहेत. जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा याद्यांवर काम करा, प्रत्येक चेहरा समाजाला पाहिजे. दुबार-तिबार तिथे आले, तर तिथेच फोडून काढा आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्या, असा सूचना राज ठाकरेंनी यावेळी दिल्या.