भंडारा जिल्ह्यातील बेटाळा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या ६ हजार रुपयांत सुपारी देऊन सासू अन् मेहुण्याने जावयाचा खून केलाय. दोनच महिन्यांपूर्वी या युवकाने प्रेमविवाह केला होता. आकाश शेंडे असे मृत युवकाचं नावं असून तो २४ वर्षाचा होता. याप्रकरणात पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
मुलीने तिच्या कुटुंबीयांचा विरोध झुगारून गावातील तरुणाशी आंतरजातीय प्रेमविवाह केला. दोन महिन्यांपूर्वी विवाह झाल्यानंतर नवदांपत्य बेटाळा गावातचं राहत होत. मुलीची आई अंजू कुंभलकर (४३) आणि भाऊ चेतन कुंभलकर (२३) यांना ही गोष्ट सहन झाली नाही. त्यामुळे आकाश शेंडे या त्यांच्या जावयाला मारण्याची ६ हजारांची सुपारी देण्यात आली.
हत्येनंतर तरुणाचा मृतदेह गावालगत असलेल्या नाल्यात फेकून ती आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आला. मात्र, मोहाडी पोलिसांनी याचा शोध आणि सखोल चौकशी केली असता जावयाची आत्महत्या नसून सासू आणि मेहुण्यानं सुपारी देत ही हत्या केल्याचा कट उघडकीस आला आहे.
भंडाऱ्याच्या बेटाळा गावात ही खळबळजनक घटना काल सोमवार रोजी घडली होती. याप्रकरणी आता मोहाडी पोलिसांनी मृतकाची सासू अंजू कुंभलकर (४३) मेहुणा चेतन कुंभलकर (२३) यांच्यासह ही हत्या करण्यात सहभाग असलेल्या भारत मोहतुरे (२६), महेंद्र बोरकर (३१), दिनेश उर्फ सचिन मोहन ईश्वरकर (३७) यांना अटक केली आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत.