अवघ्या दोन दिवसांवर लग्न येऊन ठेपले असताना, एका रस्ता अपघाताने तरुणाचे आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिपरी (पुनर्वसन) जवळील कवडसी फाट्यापाशी गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.बोहल्यावर चढण्यापूर्वीच दुर्गेश किशोर लांजेवार यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ठाणा आणि पिपरी परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कवडसी फाट्यावर गुरुवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना दुर्गेशला भंडाराकडून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (एम. एच.१४ एल. एक्स.४२१९ (MH14 LX 4219)) त्याला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दुर्गेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
दुर्गेशचा गावातीलच युवतीशी ११ जानेवारीला विवाह होणार होता. घरात लग्नाची तयारी सुरू असताना पिपरी पुनर्वसनजवळील कवडसी फाट्यावर ते कामानिमित्त गेले होते. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. पायवाटेने रस्ता ओलांडत असताना भंडाराकडून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. संसार थाटायच्या आधीच तरुणाने जीव गमावला. दुर्गेशच्या मृत्यू झाल्याने लांजेवार कुटुंबावर संकट कोसळले आहे.
वर-वधू दोघेही एकाच गावातले असल्याने गावातही उत्साहाचे वातावरण होते. पण हे सुखाचे क्षण दु:खात बदलले. दुर्गेश हा कुटुंबातील कर्ता पुरुष असल्याने त्याच्या निधनाने लांजेवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरात शुभकार्य अन् त्यात असं घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जवाहरनगर पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिमाजी पाटील करीत आहेत.