पालघरमध्ये रेल्वे अपघात संपूर्ण शहरात शोककळा पसरवणारा ठरला आहे. मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पालघर पूर्वेतील जुना पालघर भागातील जैन मंदिराजवळ ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पालघर रेल्वे स्थानकाजवळील रुळावर मालगाडीच्या धडकेत तीन तरुण जागीच ठार झाले आहेत. मृतांची ओळख स्वप्नील शैलेश पालांडे (वय 23), कुणाल कुमार दुबला (वय 23) आणि अफरोज खलील शेख (वय 28) अशी झाली असून, ते तिघेही पालघर पूर्व येथील वीरेंद्र नगर परिसरातील रहिवासी होते.
नातेवाईकांच्या आरोपांनुसार, काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांच्या भीतीपोटी हे तरुण रेल्वे रुळ ओलांडून पळत असताना मालगाडीच्या मार्गावर आले. यामुळे अपघात गंभीर झाला आणि तीन जीवांचा बळी गेला. घटना समजताच लोहमार्ग पोलिस दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असून, अपघाताची खरी कारणे तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.