आखातात सुरु असलेल्या युद्धामुळे संपूर्ण भारतात उर्जासंकट निर्माण झाले आहे. गॅस बुक करूनही लोकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नाहीये. याचा फटका अनेक हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. महाराष्ट्रातील ऊर्जासंकट वाढत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पीएनजी कनेक्शन घेणे शक्य आहे, तिथे लवकरात लवकर अर्ज करा. घरात पीएनजी कनेक्शन लावून घ्या, असे आवाहन केंद्र तसेच राज्यातील सरकारकडून केले जात आहे. पीएनजी कनेक्शनबाबत बोलताना अण्ण व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे.
छगन भुजबळ नक्की काय म्हणाले ?
ज्या ज्या ठिकाणी पीएनजी कनेक्शन घेणे शक्य आहे, त्या ठिकाणी लवकरात लवकर अर्ज करा, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे. तसेच ज्या भागात पीएनजीची व्यवस्था आहे, तिथे पीएनजी कनेक्सनसाठी तीन महिन्यांच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे. घरगुती असो किंवा व्यावसायिक उद्देशासाठी असो तुमच्या भागात पीएनजीची सुविधा असेल तर त्यांनी तसे कनेक्शन मिळावे यासाठी अर्ज करावा. पीएनजीच्या कनेक्शनसाठी अनेक कंपन्या कार्यरत आहेत. त्यांना राज्यातील वेगवेगळे भाग वाटून दिलेले आहेत, असे भुजबळ यांनी सांगितले.
तसेच, पीएनजीसाठी अर्ज कुठे करावा हे समजत नसेल तर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तो अर्ज द्यावा. त्यात पत्ता वगैरे द्या. पीएनजी कनेक्शनची व्यवस्था असल्याने तुम्ही अर्ज केलेला आहे आणि तरीदेखील तुम्हाला पीएनजी कनेक्शन न मिळाल्यास तुमचा एलपीजी पुरवठा बंद होणार नाही. तुम्ही पीएनजीसाठी अर्ज केलेला असल्याने तुम्हाला मिळणारा एलपीजी बंद होणार नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले. तसेच तुमच्या भागात पीएनजी कनेक्शनची सुविधा असूनही तुम्ही अर्जदेखील केला नसेल तर तुम्हाला मिळणारा एलपीजी बंद होऊ शकतो. जिथे पीएनजीचे काम सुरू आहे, त्याच भागासाठी हा नियम आहे. असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.