राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रीक बसेसला राज्यातील द्रुतगती महामार्गांवर १०० टक्के टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे नाशिक-मुंबई ई-शिवाई बस आता समृद्धी महामार्गावरून धावणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आणि प्रवास आणखी आरामदायी होणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून याबाबत मागणी केली होती. वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन तसेच प्रदूषणकारी वायू, हरित वायू उत्सर्जन रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आणि स्वच्छ गतिशीलता संक्रमण मॉडेल राबविण्याच्या दृष्टीने दि. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३० या कालावधीसाठी 'महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण- २०२५' जाहीर करण्यात आले आहे.
याअंतर्गत उपरोक्त मार्गांवरील खासगी, सरकारी व निमसरकारी अशा सर्व ई-वाहनांना टोलमाफीचा देखील निर्णय झाला होता. एसटीच्या ई-बसेसना देखील ही टोलमाफी लागू करण्यात आली होती. परंतु याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले नसल्याने द्रुतगती महामार्गांवर या टोलमाफीची अंमलबजावणी होत नव्हती.
याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी परिपत्रक काढण्याची मागणी केली होती.
त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत राज्य शासनाकडून दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले, तसेच नुकतीच या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे मनापासून आभार मानले आहे.
या अंमलबजावणीमुळे मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे, मुंबई-शिर्डी, तसेच मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बसेसना टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. टोलमाफीची अंमलबजावणी झाली नसल्याने राज्य परिववहन महामंडळाच्या ई-बसेसना सध्या जुन्याच महामार्गांवरुन प्रवास करावा लागत होता. मुंबई ते नाशिक हा प्रवास पूर्ण करण्यासाठी जुन्या महामार्गावरून सुमारे ४.५ तास लागत असत, तसेच टोल देखील भरावा लागत होता. कधी कधी वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागत होता.
मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे आता प्रवासाचा वेळ एक तासाने घटणार असून अवघ्या ३.५ तासांमध्ये मुंबई ते नाशिक हे अंतर पार करता येणार आहे. वेळेच्या या बचतीबरोबरच समृद्धी महामार्गावरील आरामदायी व वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाचा आनंद प्रवाशांना घेता येणार आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळाची देखील टोलपासून सुटका होणार असून वार्षिक कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे. एकंदरीतच नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने हा निर्णय नक्कीच खूप फायदेशीर ठरणार आहे.
आगामी काळात राज्य परिवहन महामंडळाकडून मुंबई-छत्रपती संभाजीनगर, मुंबई-नागपूर, नाशिक-छत्रपती संभाजीनगर, नाशिक नागपूर अशा मार्गांवर ई-बसेस सुरू करण्यात आल्यानंतर त्या मार्गावर प्रवास करणाऱ्या ई-बसेसना देखील या निर्णयाचा फायदा होणार आहे.