मोठी बातमी समोर आली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे.मंत्री छगन भुजबळ यांना ईडीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. भुजबळ यांची आता ईडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, या आधी एसीबीकडून भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला होता.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अनेक वर्षे चौकशी सुरू होती, मात्र पुरावे अभावात असल्याचे स्पष्ट होत असल्याने तपास यंत्रणांनी त्यांची निर्दोष मुक्तता केल्याचे सांगितले जात आहे. छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळात जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोखरक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप ईडीने केला होता. याप्रकरणी ईडीने छगन भुजबळ, पंकज, समीर व अन्य ५१ जणांवर २०१६ मध्ये गुन्हा दाखल केला होता.
२०२२ मध्ये समीर व पंकज यांनी खटला रद्द करण्यासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या मागदर्शकतत्त्वंनुसार, मूळ गुन्हा रद्द केल्यानंतर ईडीने पीएमएलएअंतर्गत नोंदविलेला गुन्हा कायम राहू शकत नाही. त्याअनुषंगाने आमच्यावरील खटला रद्द करण्यात यावा, असे पंकज व समीर यांनी अर्जात म्हटले होते. दरम्यान, आता या प्रकरणात ईडीने भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे.