आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसह शिंदे गटाला पराभूत करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट तयारीला लागला आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात सभांचा धडाकाच लावला आहे. कोकण, छत्रपती संभाजीनगरनंतर आता उद्धव ठाकरे सध्या बुलढाणा दौऱ्यावर आहेत.
बुलढाण्यानंतर ते शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार होते. मात्र, त्यांनी आपला नियोजित दौरा तडकाफडकी रद्द केला आहे. यामागे मोठं कारणही समोर आलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत.
सरकारने सगेसोयरे अध्यादेशाच कायद्यात रुपांतर करावं, अन्यथा येत्या २४ फेब्रुवारीपासून गावागावात रास्ता रोको आंदोलन करू, अशा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे. हीच बाब लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी आपला हिंगोली दौरा रद्द केल्याची माहिती आहे.
शुक्रवार २३ आणि २४ फेब्रुवारीपासून उद्धव ठाकरे हिंगोली दौरा करणार होते. या दौऱ्यात त्यांच्या एकूण ४ सभा होणार होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे याच दौऱ्यातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार, असं बोलले जात होते. मात्र, मनोज जरांगेंच्या इशाऱ्यामुळे त्यांना आपला दौरा रद्द करावा लागला आहे.