‘वंचित’च्या उमेदवाराच्या कारवर हल्ला! नेमकं काय घडलं?
‘वंचित’च्या उमेदवाराच्या कारवर हल्ला! नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचारही शीगेला पोहोचला आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरु झाले आहे. मात्र, त्याआधीच मध्यरात्री अहमदनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर सोमवारी रात्री हल्ला झाला आहे. अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ ही घटना घडली आहे. हल्ला करणारे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. सुदैवाने या हल्ल्यात उत्कर्षा रूपवते यांना काही झाले नाही, परंतु त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?

शिर्डी लोकसभेतील वांचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते या त्यांचा प्रचार दौरा आटोपून परत येत होत्या. रात्री 10 वाजता प्रचार सभा आटोपून त्या अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ आल्या. यावेळी अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला. हल्ला करणारे दोन जण असल्याचे सांगितले जात आहे. या दगडफेकीत गाडीच नुकसान झाले. सुदैवाने रुपवते यांना काहीच झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वंचित आघाडीचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक पांडूरंग कावळे, कर्मचारी अशोक गाडे, विजय फटांगरे, शिंदे आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. त्याचवेळी वंचित आघाडीचे कार्यकर्ते आले. या घटनेमुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांना पोलिसांनी आणि उत्कर्षा रुपवते यांनी शांत केले.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group