नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या अग्निवीर धोरणाबाबत संसदेत मोठा गदारोळ झाला. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावरून हा गोंधळ झाला. अध्यक्षांच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावर राहुल गांधी आपले मत मांडत होते. यादरम्यान अग्निवीर योजनेवर भाष्य करताना ते म्हणाले - 'लँडमाइनच्या स्फोटात एका अग्निवीरचा जीव गेला, पण त्याला शहीद म्हटले जात नाही. मी त्यांना शहीद म्हणतो, पण भारत सरकार त्यांना शहीद म्हणत नाही. पीएम मोदी त्यांना शहीद नव्हे तर अग्निवीर म्हणतात.
त्यांच्या कुटुंबाला पेन्शन मिळणार नाही. त्याला नुकसान भरपाई मिळणार नाही, अग्निवीरचा वापर करून फेकून दिले जाते.'' असा आरोप राहुल गांधींनी केंद्र सरकारवर केला.अग्नीवीर योजनेवर राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावर उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, शहीद अग्निवीराच्या कुटुंबाला आवश्यक आर्थिक मदत करण्यात आली आहे. शहीदांना गार्ड ऑफ ऑनरही दिला आहे. की युद्धादरम्यान किंवा सीमेच्या सुरक्षेदरम्यान आमचा सैनिक (अग्नवीर) शहीद झाला तर त्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची भरपाई दिली जाते.''
अग्निवीराचा ऑन ड्युटी मृत्यू झाला तर किती पैसे मिळतात?
जर एखाद्या अग्निवीराचा ड्युटीवर असताना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ४८ लाख रुपयांचे विमा संरक्षण, ४४ लाख रुपये, उर्वरित चार वर्षांच्या सेवेसाठी पूर्ण वेतन आणि सेवा निधी मिळतो. याशिवाय सेवानिधी फंडात जमा केलेली रक्कम आणि अग्निवीर कॉर्पस फंडातील व्याजासह सरकारी मदत दिले जाते.
ड्युटीवर असताना अपंगत्व आले तर?
लष्कराच्या माहितीनुसार, जर एखादा अग्निवीर अपंग झाला तर त्याला 100%, 75% किंवा 50% अपंगत्वाच्या पातळीनुसार 44 लाख रुपये, 25 लाख रुपये किंवा 15 लाख रुपये देण्यात येतो. तसेच,अपंग झाल्यानंतर नोकरीसाठी शिल्लक राहिलेल्या वेळेसाठी पूर्ण वेतन आणि सेवा निधी दिला जातो. याशिवाय सेवानिधी फंडात जमा केलेली रक्कम व्याज आणि सरकारी योगदानासह अग्निवीर कॉर्पस फंडातूनही दिली जाते.