जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
img
दैनिक भ्रमर
बौद्ध धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या ‘वर्षावासा’च्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भंतेजींना चिवरदान, भोजनदान आणि धम्मदान झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. “अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती असली तरी जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे. हे आपण आचरणात आणले तर समाज, राज्य आणि देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही”,  असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.


“आज ज्ञान जरी खूप असले तरी बुद्धाचे तत्वज्ञान देखील तितकेच आवश्यक आहे”, असेही ते म्हणाले. “दौलत मिली किसको तो धनवान बन गया, ताकद मिली किसको तो पहलवान बन गया, बाबासाहेब मिले मुझको तो इन्सान बन गया”, अशी रचना सादर करत त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आदर व्यक्त केला. “राज्याचा कारभार तथागत गौतम बुद्ध यांची शिकवण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  ‘वर्षा’वर असा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्याचे भंतेजींनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. असा कार्यक्रम प्रथम होतो आहे आणि मी मुख्यमंत्री असताना होत आहे हे ऐकून मलाही भारी वाटल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आपल्याला आपले राज्य शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर करायचे आहे. गोरगरीब, महिला, शेतकरी यांच्या आयुष्यात सुखासमाधानाचे दिवस येतायेत. विविध योजनांच्या माध्यमातून मला जनतेची सेवा करायली मिळते आहे. विकास करताना लोककल्याणकारी योजनांची सांगड घालतोय, याचा मला आनंद आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले

तसेच , ऑल इंडिया भिक्षू महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्ता महाथेरो म्हणाले की तथागत भगवान गौतम बुध्दाच्या काळात प्रसेनजित नावाचा राजा होता तोसुद्धा अशाच प्रकारे भोजनदान, धम्मदान करत होता. त्याची आज आठवण आम्हाला आली, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी असा हा भोजनदानाचा कार्यक्रम झाला याची इतिहासात नोंद होईल, असे गौरवोद्गार महाथेरो यांनी काढले. वर्षावर प्रथमच अशा प्रकारचा सोहळा आयोजित केल्याबद्दल भंतेजींनी आनंद व्यक्त केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group