महाराष्ट्रात नोव्हेंबर २०२४ मध्ये महायुतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, खातेवाटप झाले, पालकमंत्री आणि मंत्र्यांच्या बंगल्याचे वाटपही झाले. पण अद्यापही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षावर मुक्कामाला गेले नाहीत, हाच धागा पकडत संजय राऊतांनी खळबळजनक दावा केलाय.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत आरोप केलाय. देवेंद्र फडणवीस अजूनही वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? असा सवाल करत संजय राऊत यांनी खळबळजनक वक्तव्य केलेय.
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? मारूती कांबळेचे काय झाले? मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन इतके महिने झाले, वर्षा मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे, तिथे का जात नाहीत? याचे उत्तर लिंबू सम्राटने द्यावे. भाजपच्या गोटात चर्चा आहे की, कामाख्या देवीला रेडे कापले, त्याची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून पुरली आहेत, असं स्टाफ आणि त्याचे लोक सांगतात, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊतांच्या दाव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलेय.
मुख्यमंत्रिपद कोणाकडे टिकू नये यासाठी, मंतरलेले शिंग आणले, अशी चर्चा आहे. आमचा विश्वास नाही, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पळणारी लोक आहोत, असे संजय राऊत म्हणाले. आम्ही मुद्दा लावून धरत आहोत, काहीतरी वेगळे घडू शकते. नेमके काय झाले, मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे? ते का अस्थिर अस्वस्थ आहेत? असेही संजय राऊत म्हणाले.
आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे. अंधश्रद्धा निर्मूलनसाठी काम करणारे आहेत. फुले, शाहू यांनी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केले, तरीही महाराष्ट्रमध्ये अंधश्रद्धा कायम आहे. उदय सामंत हे सुद्धा कोकणातले आहेत, त्यांच्याकडे ताकद असेल तर त्यांनी त्यांचे काम करत रहावे, आम्ही आमचे काम करत राहू, असे संजय राऊत म्हणाले.