वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला. त्यामुळे वैष्णवीने जीवनच संपवलं. मात्र, वैष्णवीने जीवन संपवलं नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा दावा वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. हुंड्यामुळे एखाद्या मुलीला आयुष्य संपवावं लागतं या गोष्टीमुळेच महाराष्ट्र सुन्न झाला आहे. त्यामुळे हुंड्याची अनिष्ट प्रथा मोडीस काढण्यासाठी पुण्यातील काही ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.
प्रीवेडिंग करू नका, मानपान, सत्कार वगैरे करू नका आणि एकवेळ पत्रिका नाही पाहिली तरी चालेल पण मुलांची आरोग्य तपासणी करा, असा निर्णयच ग्रामस्थांनी घेतला आहे.
वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळीच्या पार्श्वभूमीवर हुंडाबंदीसह लग्नातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील धायरी ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. धायरी येथे ग्रामस्थांनी ग्रामसभा आयोजित केली होती.
यावेळी मराठा, बहुजनांसह अठरापगड जातीच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत भाग घेतला. सर्वांनी एकमताने हुंडा न देणे आणि हुंडा न घेण्याचा ठरावही मंजूर केला. या वेळी लग्नातील अनेक चुकीच्या प्रथा बदलण्याचे ठरावही मंजूर करण्यात आले
साखरपुडा, लग्न एकाच दिवशी करा
हुंड्यावरून छळ होऊ द्यायचा नाही आणि सहनही करायचा नाही, हुंड्यावरून छळ होत असल्यास मुलीला सासरी पाठवायचे नाही, कमी खर्चात आणि कमी लोकांमध्ये लग्न पार पाडावीत, लग्न वेळेतच लावावीत, एकाच दिवशी साखरपुडा, लग्न आणि अन्य विधी करावेत. मान्यवरांनी स्टेजवर गर्दी करण्याचे टाळावे. नेत्यांच्या मानपानात वेळ वाया घालवू नये, सत्कार करु नयेत, साखरपुड्याला कमी महिला आणि कमी पुरुषांनी औक्षण करावे, लग्नात नाहक खर्च करू नये, जेवणामध्ये मोजकेच पदार्थ करावेत. जास्त पदार्थ टाळावेत, पारण्याच्या मिरवणुका आणि त्यामुळे होणारी गर्दी टाळावी. आपल्यामुळे ट्रॅफिक जॅम होणार नाही याची काळजी घ्यावी. प्री व्हिडिओ शूटिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जाणार वेळ वाचवावा, असा निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला.
ठरावांचे फलक गावात लावा
फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट यांना समज देण्यात यावी. लग्न ठरण्यापूर्वी एक वेळ पत्रिका नाहीं पाहिली तरी चालेल पण मुलांचे शारीरिक आरोग्य तपासणी करूनच लग्ने ठरवावीत. लग्नात काय दिले, काय नाही याची चर्चा करू नये. सोने, चांदी, आहेर यांचा उल्लेख टाळावेत. आदर्श विवाह घडवून आणणाऱ्या कुटुंबाचा सन्मान करण्यात यावा. ठरावांचे फलक गावात लावण्यात यावेत. चुकीच्या प्रथा बंद करून मुलगा आणि मुलगी कसे सुखी राहतील याचा विचार करावा, असा ठरावच या ग्रामसभेत करण्यात आला.
वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात निर्माण झालेल्या विविध समस्यांवर विचारविनिमय करण्यासाठी अहिल्यानगर येथील सुवर्णम प्राईड येथे मराठा समाजाने एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत समाजातील विविध मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली आणि समाजाला काही सूचना करण्यात आल्या.
हुंडा प्रथा बंद करावी त्याऐवजी मुलीच्या नावाने मुदत ठेव करावी. पैशांसाठी मुलीचा छळ करू नये, ‘प्री-वेडिंग’ प्रकार बंद करावा जर प्री-वेडिंगचे फोटो किंवा व्हिडिओ लग्नात स्क्रीनवर दाखवले तर प्रतिष्ठित व्यक्ती विवाह सोहळा सोडून निघून जातील. लग्न सोहळा 100 ते 200 लोकांमध्येच करावा. डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये आणि लोक कलावंतांचा वापर करावा.
लग्न सोहळा वेळेवरच पार पाडावा असे नियम घालून देण्यात आलेत. तसेच सर्वांनीच हे नियम पाळावे असे आवाहन केवळ करण्यात आले आहे. कोणतेही सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र समाजहित लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांनी हे नियम पाळावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.