देवळा : तालुक्यातील भऊर येथे जल जीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गावात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
त्यामुळे आज संतप्त महिलांनी गावात हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. गावात तत्काळ पुरवठा सुरळीत सुरू करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन यावेळी ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ पवार यांना देण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळा तालुक्यातील भऊर गावात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर नल अंतर्गत जल जीवन मिशन योजनेंतर्गत नवीन पाणी पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले असून, त्या कामात संबंधित ठेकेदाराकडून अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे गावात सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू करण्यात आलेले सदर काम अद्याप अपूर्ण असल्याने ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात आली नाही.
योजनेच्या उद्घभव विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असताना गावात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने बुधवारी संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून कार्यालयाला कुलूप ठोकले. योजनेचे काम तत्काळ पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी निलाबाई पवार, योगिता पवार, शिलाबाई पवार, संगीता जोंधळे, लीला जोंधळे, हर्षदा पवार, सविता पवार, वर्षा पवार, विद्या पवार, इंदुबाई पवार, मताबाई शिंदे, केदा पवार, मिलिंद पवार, प्रदीप पवार, उमेश पवार, दीपक पवार, नंदू सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सीमा गरुड, गंगाराम ठाकरे, उर्मिला गवळी, चित्रा बिरारी ,मनीषा पवार, निर्मला देवरे, शोभा पवार, उषा पगार आदी उपस्थित होते.
या योजनेच्या कामावरील ठेकेदाराला सूचना करण्यात येऊन पाईपलाईनचे लिकेज काढण्याचे काम सुरू केले असून, नळ कनेक्शन देण्याचे कामही करण्यात येणार असल्याचे देवळा पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता वासंती बोरसे यांनी सांगितले.