केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत प्रस्तावित असलेल्या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे मध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता हा प्रकल्प नाशिक-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे म्हणून ओळखला जाईल. नाशिक ते सुरतदरम्यानचा नियोजित मार्ग रद्द करण्यात आला असून, हा महामार्ग आता नाशिकपासून थेट चेन्नईपर्यंत धावणार आहे.
देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पांपैकी एक असलेला सुरत–चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे उभारणीच्या दिशेने मोठ्या वेगाने पुढे जात आहे. देशातील सहा राज्यांना जोडून सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे उभारण्यात येत आहे. या कॉरिडोरचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे नाशिक-चेन्नई दृतगती मार्ग. सूरतवरून चेन्नईला जोडणारा हा दृतगती मार्ग नाशिकमधून जात असल्यामुळे शहरात सहा पदरी एक्सप्रेसवे उभारला जाणार आहे.
हा दृतगती मार्ग नाशिकमधून पुढे सरकत पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराशी थेट जोडला जाईल. याव्यतिरिक्त तो थेट चेन्नई बंदराशीही जोडला जाणार आहे. यामुळे नाशिककरांना दोन मोठ्या बंदरांशी द्रुत व सरळ जोडणी, मालवाहतुकीसाठी जलद नेटवर्क आणि व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा एक्सप्रेसवे वाढवण आणि चेन्नई बंदरांना प्रथमच एका सरळ मार्गाने जोडण्याचा विक्रम करणार आहे.
प्रकल्प दोन प्रमुख टप्प्यांत राबवला जात असून पहिल्या टप्प्यात नाशिक–अक्कलकोट सहा पदरी दृतगती मार्गाचे 374 किमी अंतर समाविष्ट आहे. सध्या नाशिक ते अक्कलकोट अंतर: 524 किमी आहे तर या प्रवासासाठी साधारण ९ तासाचा वेळ लागतो आता नव्या मार्गामुळे हे अंतर कमी होऊन १५० किमी पर्यंत होणार असून नव्या दृतगती मार्गावरील प्रवास वेळ सुमारे ४ तासांपर्यंत येईल.
हा संपूर्ण प्रकल्प BOT (Build–Operate–Transfer) तत्त्वावर विकसित करण्यात येत आहे. सुरत–चेन्नई एक्सप्रेसवे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या सहा राज्यांना थेट जोडणार आहे. दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवेनंतर हा देशातील दुसरा सर्वांत लांब दृतगती मार्ग ठरणार आहे. नाशिकवरून चेन्नईकडे जाताना हा मार्ग थेट आंध्र प्रदेशात प्रवेश करील आणि धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या तिरुपतीला थेट जोडणी उपलब्ध होईल. पूर्वी हा प्रवास 22–23 तासांचा असे. नव्या एक्सप्रेसवेमुळे तो 12 तासांवर येणार आहे.
नाशिक जिल्ह्यात हा दृतगती मार्ग खालील प्रमुख ठिकाणांशी थेट जोडला जाणार आहे:
आडगाव ट्रक टर्मिनल : मुंबई–आग्रा महामार्गाशी जोडणी
गोंदे–दुमाला : तवा नाशिक एक्सप्रेसवेशी कनेक्टिव्हिटी आणि वाढवण बंदराचा थेट प्रवेश
वावी (सिन्नर) : समृद्धी महामार्गाशी जोडणी
नाशिक जिल्ह्यातील सहा तालुके आणि अंदाजे 70 गावांमधून हा मार्ग जाणार आहे. या प्रकल्पासाठी 195 हेक्टर भूसंपादन करण्यात येणार असून, त्याबाबतची प्राथमिक तयारी सुरू आहे.
या कॉरिडोरवरील प्रमुख शहरे:
नाशिक - अहिल्यानगर (औरंगाबाद) - सोलापूर - अक्कलकोट - कलबुर्गी - कर्नूल - कडप्पा - तिरुपती - चेन्नई