नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात काल रात्रभरापासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. काही दिवसांपासून शांतता घेतल्या पावसाने आता अचानक मोठी उसळी घेतल्याने संपूर्ण जिल्यात आता पावसाचा हाहाकार माजला आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली असून, रामकुंड परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदाघाटावरील प्रसिद्ध ‘दुतोंड्या मारुती’च्या कमरेपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून परिसरातील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने गोदाघाट परिसरातील दुकाने व टपऱ्या सुरक्षित ठिकाणी हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ८० टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने या हंगामात गंगापूर धरणातून प्रथमच विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गुरुवारी सकाळी रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले.
गंगापूर धरणातून 7,413 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग
नाशिक शहर परिसरात मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु असून बुधवारी रात्री पावसाचा जोर अधिक वाढला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पावसाची संततधार कायम असल्यामुळे गुरुवारी सकाळी ८ वाजता गंगापूर धरणातून सोडण्यात येणारा पाणी विसर्ग एकूण ३१६५ क्युसेक इतका करण्यात आला आहे. हा विसर्ग ज सकाळी ९.३० वाजता ४२३६ क्युसेक करण्यात आला. तसेच नंतर पुन्हा त्यात वाढ करण्यात आली असून सकाळी १०.३० वाजता एकूण विसर्ग ५२९५ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. तर सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग 6,354 क्यूसेक्सवरून 7,413 क्यूसेक्स करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग टप्प्याटप्प्याने पुन्हा वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने याबाबत सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.