नाशिक - मालेगाव येथील परिस्थिती पूर्णपणे शांत असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले आहे.
केवळ गैरसमज झाल्यामुळे नागरिक कोर्टात घुसले त्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांनी या सर्व नागरिकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांची समज दूर करण्याचा प्रयत्न केला . नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घेऊ नये, गैरसमज करू नये, पोलीस सर्वतो परी प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की , नागरिकांच्या भावनांची मी कदर करत असून प्रत्यक्षात नागरिकांच्या भावना जास्तच अनावर असल्यामुळे आरोपीला नागरिकांच्या ताब्यात देता येणार नाही. नागरिकांनी देखील या परिस्थितीला समजून घ्यावे असे सांगून पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी सांगितले की या सर्व प्रकरणावरती पोलीस लक्ष ठेवूनच आहे. आता या ठिकाणी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे देखील पोहोचले आहेत. ते या ठिकाणी नागरिकांची चर्चा करणार आहेत.
ते पुढे म्हणाले की या सर्व प्रकरणांमध्ये आता डोंगराळ या परिसरात पोलीस चौकी नव्हती ती तातडीने सुरू केली आहे गावामध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचे सांगून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.