दिंडोरी तालुक्यामध्ये सातत्याने अपघातांचे प्रमाण सुरूच असून अवघ्या चार दिवसांपूर्वी कार विहिरीत पडल्यानंतर सहा बालकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर काल दिवसभरात चार बालकांचा मृत्यू झाला आहे.
पहिली दुर्दैवी घटना परमोरी येथे घडली. वरखेडा येथील जनता विद्यालयात शिकणारे समीर रावसाहेब गांगोडे (वय 14) आणि यश राहुल पगारे (वय 12) हे दोन विद्यार्थी कादवा नदीत पोहोण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. त्यांच्यासोबत असलेला तिसरा विद्यार्थी सुदैवाने बचावला आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे घडली. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील रुद्र गणेश जाधव (वय 13) आणि ओमकार सुनील फटांगळे (वय 13) हे दोन विद्यार्थी एका धार्मिक कार्यक्रमासाठी खेरवाडी येथे गेले होते. दुपारी 2 वाजेच्या सुमारास गागरा ओहळात अंघोळीसाठी उतरले असता दोघांचाही बुडून मृत्यू झाला. हे दोघेही मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी होते. या घटनेची नोंद सायखेडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.