सातपूर - महात्मा नगर सिग्नल परिसरात पिण्याच्या पाण्याची मुख्य पाइपलाईन फुटल्याने सर्वत्र पाणी साचले. आधीच खोदून ठेवलेल्या रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने चिखल आणि पाण्याचे डबके निर्माण झाले आहेत. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सामना करावा लागत आहे.
सिग्नल जवळ रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांची रहदारी मंदावली. विशेषतः चारचाकी वाहनचालकांना मोठा फटका बसला असून काही वाहने पाण्यात अडकून पडल्याचेही दिसून आले. त्यामुळे सिग्नल परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, सातपूर मंडळाचे माजी अध्यक्ष भगवान काकड हे कामानिमित्त नाशिककडे जात असताना त्यांच्या वाहनालाही या परिस्थितीचा फटका बसला. पाण्याच्या साचलेल्या खड्ड्यात त्यांची गाडी अडकून पडल्याने त्यांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला. या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.मनपा प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत रस्त्यांची कामे सुरू असताना योग्य नियोजन नसल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या घटनेमुळे माझी गाडी एक तास अडकून पडली होती.याचा मला खुप त्रास झाला.विकासकामे होणे गरजेचे आहे.त्याचे नियोजन योग्य पद्धतीने केले गेले पाहिजे. नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
भगवान काकड , भाजप मंडल माजी अध्यक्ष