मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण........
मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण........
img
Dipali Ghadwaje
पुणे : पुण्यातील जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. तत्पूर्वी विघ्नहर साखर कारखान्यात आसवनी आणि इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचं लोकार्पणही शरद पवारांच्या हस्ते झालं. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार  इंडिया आघाडीच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिल्यानंतर शरद पवारांनी पुण्यात जुन्नरमधील  शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना मिळालेला नफा, या मुद्द्यांवरही भाष्य केलं.

तसेच, पंतप्रधान मोदींनी  नाशिक दौऱ्यावेळी राजकारणातील घराणेशाहीवर केलेल्या टीकेलाही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  पंतप्रधान मोदी काल नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी बोलताना राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली होती.  "ते म्हणाले की, घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होतो, मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली? त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाहीबाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं.", असं शरद पवार म्हणाले. 

एवढंच नाहीतर अयोध्येत  22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचं  आमंत्रण मिळालेलं नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण 22 जानेवारीला नाहीतर, नंतर नक्की जाणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. 

मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण... : शरद पवार 
"अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही, पण मी जाणार. मात्र 22 जानेवारीला नाही जाणार, नंतर नक्की जाणार, श्रीराम हे सर्वांचे आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत. 

"अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ केलेली आहे. दहा हजारांचे तिकीट चाळीस हजार करण्यात आलेत. विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेलं नाहीतर, त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणं चुकीचं राहील. राम मंदिराचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतली आहे. आता मंदिराचं काम पूर्ण व्हायला आणखी दोन वर्षे तरी लागतील.", असंही शरद पवार म्हणाले आहेत. 

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group