मराठा आंदोलन पुन्हा पेटलं! लालपरीची सेवा बंद
मराठा आंदोलन पुन्हा पेटलं! लालपरीची सेवा बंद
img
Dipali Ghadwaje
राज्य सरकारने सगेसोगरे अध्यादेशाचा कायदा करून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे.  

दरम्यान बीडमध्ये मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटल्याचे चित्र पहायला मिळतंय. बीडच्या पाडळशिंगी परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी पुन्हा एकदा एसटी बसेसला टार्गेट केलंय. तर धाराशिवमध्येही अज्ञातांकडून एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून महामंडळाने लालपरीची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुढील आदेश येईपर्यंत एसटी बसेस सोडल्या जाणार नाहीत, असे बोर्ड बस स्थानकावर लावण्यात आले आहेत. धाराशिव बस स्थानकातून सुटणाऱ्या बस शुक्रवारी सकाळपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. बीड बसस्थानकातून सुटणाऱ्या एसटी बसेसही शुक्रवारी बंद ठेवण्यात आल्या आहेत. लालपरीची चाके थांबल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे पुन्हा एकदा हाल होत आहेत. 

खाजगी वाहनधारकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट देखील केली जात आहे. अव्वाच्या-सव्वा भाडे आकरले जात असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. सरकारने मराठा आरक्षणावर कायमचा तोडगा काढून हा विषय संपवावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. यामुळे आता या सर्वसामान्य प्रवाशांचे हाल सोडवण्यासाठी सरकार नेमकं काय निर्णय घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group