जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे मंगळवारी दुपारी ४ दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या मृत पर्यटकांमध्ये ६ पर्यटक हे महाराष्ट्रातील आहेत.
महाराष्ट्रातील या मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांना सरकारने ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याचसोबत जम्मू-काश्मीर सरकारने देखील २७ मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर केली आहे.
महाराष्ट्र सरकारने पहलगाम हल्ल्यातील मृतांना मदत जाहीर केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट देखील केले आहे.
'पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण ६ जणांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. तर, जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.
महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल.', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
तर, जम्मू आणि काश्मीर सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या २७ जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे . तर जखमींना २ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.