येवला :- सध्या भारत पाकिस्तान मध्ये युद्धाची परिस्थिती असताना अंकाई किल्ला परिसरात मोठा स्फोट झाल्याचा आवाज झाला.
हा आवाज व स्फ़ोटचा धक्का इतका भयंकर होता की याचे पडसाद मनमाड शहरापर्यंत तसेच येवल्याच्या नगरसुल अंदरसुल तसेच चांदवड तालुक्यातील काही ठिकाणी व आजूबाजूच्या परिसरात जाणवला.
नेमकं काय झाले हे समजले नाही मात्र नागरिक घाबरले. त्यांनी येवला तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून ही माहिती दिली. पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होत त्यांनी तपास केला. दरम्यान, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
येवला तालुका ग्रामिण पोलिसांनी अंकाई किल्ला परिसर पिंजून काढला मात्र कुठेही काहीच आढळून आले नाही. या भागात असलेल्या शेती तसेच खडी क्रशर यांच्याकडे विचारपूस करण्यात आली मात्र आम्ही कोणत्याही प्रकारचा स्फोट घडवला नाही असे त्यांनी सांगितले.
याबाबत ग्रामस्थांना देखील विचारणा करण्यात आली. मात्र ,आम्ही फक्त आवाज ऐकला तो आकाशातील रॉकेटचा होता की आणखी कसला हे आम्हाला समजले नाही. याबाबत बराच वेळ शोध घेण्याची कार्य सुरू होते.
पोलिसांनी शोध घेतला असता अंकाई किल्ल्याजवळ विहीर खोदण्यासाठी ब्लास्टिंग केल्याचे समोर आले. हे पोलिसांनी सांगताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.