मनमाड (प्रतिनिधी) :- इंदूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मनमाड नजीक असलेल्या अनकवाडे येथे दुपारच्या सुमारास दुचाकी व मालवाहू ट्रक मध्ये अपघात घडला. या अपघातामध्ये दुचाकी वरील ४९ वर्षीय महिलेला डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार हा जखमी झाला आहे. अपघाताची घटना कळतच घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाड शहरापासून जवळ असलेल्या अनकवाडे येथे आज दुपारच्या सुमारास कुंदलगाव येथे पाहुण्यांना भेटून दुचाकी वरून मंगल संजय शिलावंत आणि मुलगा शंकर संजय शिलावंत कोपरगाव टाकळी येथे घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या मालवाहू ट्रक क्रमांक टि.एन -१८, ए.यू ९२९० या गाडीचे नियंत्रण सुटल्याने पुढे जाणाऱ्या टीव्हीएस कंपनीच्या दुचाकीला जबर धडक दिली .
या धडकेमध्ये दुचाकीस्वार स्वार जखमी झाला असून पाठीमागे बसलेल्या मंगल संजय शिलावंत, वय - ४९, रा. कोपरगाव टाकळी यांच्या हाता पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून याप्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.