नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- चार धाम यात्रेच्या बुकिंगसाठी दिलेले पैसे परत न करता यात्रा रद्द करून 16 भाविकांची सव्वाचार लाख रुपयांची फसवणूक करणार्या यात्रा कंपनीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी मयुरेश वाघ याच्या मालकीची पंचवटीतील सेवाकुंज झुंड हनुमान मंदिराजवळ शौर्य यात्रा कंपनी आहे. त्यांनी भाविकांना चारधाम यात्रा दर्शन करून देतो, असे फिर्यादी नीलेश किशन भोर (रा. सद्गुरूनगर, दसक, जेलरोड) व त्यांच्यासोबतच्या इतर लोकांकडून पैसे घेऊन यात्रेचे बुकिंग करण्याच्या नावाखाली हरिश्चंद्र मिस्त्री यांच्याकडून 19 हजार 50 रुपये, धनंजय कपोते यांच्याकडून 31 हजार 750 रुपये, पोपट अरगडे यांच्याकडून 19 हजार 50 रुपये, सुधीर भंडारे यांच्याकडून 39 हजार 400 रुपये, श्याम नेहे यांच्याकडून 25 हजार 400 रुपये, सुरेश डावरे यांच्याकडून 12 हजार 700 रुपये, विजय खैरनार यांच्याकडून 38 हजार 100 रुपये, मधुकर टिळे यांच्याकडून 12 हजार 700 रुपये, प्रवीण देशमुख यांच्याकडून 25 हजार 400 रुपये, धोंडीराम बर्वे यांच्याकडून 19 हजार 500 रुपये, वैशाली आहेर यांच्याकडून 16 हजार रुपये, श्वेता शेळके यांच्याकडून 31 हजार रुपये, नरेंद्र वाणी यांच्याकडून 18 हजार 900 रुपये, सदाशिव भरदाणे यांच्याकडून 26 हजार 200 रुपये, रोहिदास सोनवणे यांच्याकडून 26 हजार 200 रुपये, रमेश कांगणे यांच्याकडून 26 हजार 200 रुपये व दिलीप ठाकूर यांच्याकडून 14 हजार रुपये असे मिळून सर्व भाविकांकडून 4 लाख 26 हजार 950 रुपये स्वीकारून त्यांचे चारधाम यात्रेसाठी बुकिंग केले; मात्र या 16 भाविकांना यात्रा रद्द करून यात्रेला नेले नाही.
तसेच चारधाम यात्रेच्या बुकिंगसाठी दिलेले पैसे परत न करता 16 भाविकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी नीलेश किसन भोर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात आरोपी मयुरेश वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेमाणे करीत आहेत.