नाशिक - शहरातील मुंबई नाका परिसरामध्ये असलेल्या नंदिनी नदीच्या किनारी वापरलेल्या जिलेटिनच्या कांड्या फेकून देण्यात आल्यामुळे काही काळ स्फोटके सापडल्याची चर्चा झाल्याने शहरामध्ये खळबळ उडाली होती.
परंतु पोलिसांनी सर्व तपास करून यापासून कोणताही धोका नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि दुसरीकडे शुक्रवारी ईद-ए-मिलाद चा कार्यक्रम देखील होणार आहे. या पार्श्वभूमीवरत आधीच पोलिस बंदोबस्त तैनात असताना अचानकपणे नाशिक शहरात स्फोटके सापडल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरा मुंबई नाका परीसरात असलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या मागील बाजूस असणाऱ्या नंदिनी नदीच्या किनारी जिलेटीनच्या कांड्या संशयास्पदरित्या आढळून आल्या. या कांड्या वापरलेल्या असल्याने कोणताही धोका नाही.
दरम्यान, या कांड्या कुणी टाकल्या याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तर घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले असून, संशयास्पद वस्तुंची तपासणी सुरू आहे. तसेच या कांड्यापासून कोणताही धोका नसल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असून, पुढील तपास सुरु आहे.