मराठा आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचा मोर्चा मुंबईत लवकरच धडकणार आहे त्यामुळे राज्य सरकारची कोंडी वाढणार असल्याचं चित्र आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत दाखल झाला होता. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला.
ज्यामुळे जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर मोठं यश आलं. या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत समाधान व्यक्त केले होते. मात्र, सरकारच्या या जीआरला ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध केला जात आहे. लक्ष्मण हाके, छगन भुजबळ यांनी या जीआरचा मोठा विरोध केला. मंत्री छगन भुजबळ यांनी या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. आता मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाज देखील मुंबईत लवकरच महामोर्चा काढणार आहे.
मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजही आक्रमक पवित्र्यात आला आहे. दसऱ्यानंतर ८ किंवा ९ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य ओबीसी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आज ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांची ऑनलाइन बैठक होणार असून, यामध्ये मोर्चाच्या अंतिम तारखेचा निर्णय घेतला जाणार आहे.