ओबीसी प्रवर्गातून मिळालेल्या आरक्षणाबाबत मराठा समाजात संभ्रम आहेत तर ओबीसी समाजात यामुळे असंतोष आहे. राज्यातील ओबीसी नेते या विषयावर आक्रमक झाले आहेत. फडणवीस सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी तर मराठा आरक्षणासाठी काढलेला 'GR मागे घ्या अन्यथा अराजकता माजेल', असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. हा वाद चिघळलेला असतानाच लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील 35 वर्षीय तरुण भरत कराड यांनी मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून आपली व्यथा मांडली आहे. भरत कराड या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीमध्ये लिहिले की, मी भरत महादेव कराड आताच महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसीचे कायमस्वरूपी आरक्षण संपवले आहे.
मी वेळोवेळी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता. तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करून ओबीसी विरोधी जीआर काढल्यामुळे मी माझे जीवन कायमस्वरूपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा.' या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय कुणीही घेऊ नये, असं आवाहन त्यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत केलं. आत्महत्या करु नका, असं आवाहन भुजबळांनी केलं आपण कायद्यानं लढतोय. शांततापूर्ण वातावरणात मोर्चे काढतोय. आमच्या आंदोलनात सामील व्हा, धीर सोडू नका, असंही भुजबळांनी सांगितलं.