एका उच्चशिक्षित आईने आपल्या दोन लेकरांसह आयुष्य संपवले आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी या मातेने चिठ्ठी लिहीत टोकाचे पाऊल उचलण्यासाठी माफी मागितली आहे. ही मन हेलावणारी घटना हैदराबाद येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या बोडुप्पल भागातील हरितहरम कॉलनी येथे वास्तव्यास असणाऱ्या पिन्निंती विजय शांती रेड्डी (वय 38) आणि तिची दोन मुले चेतना रेड्डी (वय 18) आणि विशाल रेड्डी (वय 17) यांचे हैदराबादमधील चेरलापल्ली रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी रेल्वे रुळांवर मृतदेहआढळून आले. शनिवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता शांती रेड्डी घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी इंटरमिजिएटचे शिक्षण घेत असलेल्या आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्या-त्यांच्या वसतिगृहातून घेतले.
तिघेही नंतर आपल्या कारमधून थेट चेरलापल्ली रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले.रेल्वे स्थानकाबाहेर कार उभी केल्यानंतर तिघेही रेल्वे रुळांच्या दिशेने गेले, जिथे नंतर त्यांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान स्थानकाबाहेर उभी असलेली कार पोलिसांनी तपासणीसाठी जप्त केली.
या प्रकरणात तपासाला एक महत्त्वाची दिशा देणारा धागा पोलिसांच्या हाती लागला. कारमध्ये शांती रेड्डी यांच्या हस्ताक्षरातील एक चिठ्ठी आढळून आली आहे. पोलिस सूत्रांनुसार, या चिठ्ठीत शांती रेड्डी यांनी आपले जीवन संपवण्याबद्दल माफी मागितली असून, त्यामागची नेमकी कारणे स्पष्ट केलेली नाहीत. मात्र आपल्या मुलांना या जगात एकटे सोडायचे नाही, अशी भावनिक नोंद त्या चिठ्ठीत असल्याचे सांगण्यात येत आहे.