गुजरातच्या सुरत जिल्ह्यात एका महिलेने आपल्या दोन मुलींना विष देऊन त्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं ?
प्राथमिक माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मृत महिला, तिचा पती आणि दोन मुलींनी एकत्र बसून जेवणे केले. जेवण आटोपल्यानंतर पती नेहमीप्रमाणे आपल्या कामावर निघून गेला. मात्र, पती घराबाहेर पडल्यानंतर काही वेळातच महिलेने पाण्यात विष मिसळले. तिने प्रथम आपल्या दोन निष्पाप मुलींना ते विष पाजले आणि त्यानंतर स्वतःही ते प्राशन केले. विषबाधेमुळे मायलेकींचा जागीच मृत्यू झाला.
आत्महत्येपूर्वी संबंधित महिलेने स्वतः आपल्या पतीला फोन केला. तिने अत्यंत शांत पण शोकपूर्ण आवाजात पतीला सांगितले की, "मला आता यापुढे जगायचे नाहीये, मी स्वतः विष घेतले आहे आणि त्यापूर्वी दोन्ही मुलींनाही विष दिले आहे." पत्नीचा हा फोन ऐकून पतीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तातडीने आपल्या चुलत भावाला फोन करून घरी धाव घेण्यास सांगितले. मात्र, जोपर्यंत कुटुंबीय घरी पोहोचले, तोपर्यंत खूप उशीर झाला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली. महिलेने इतके टोकाचे पाऊल का उचलले? सुखी संसार सुरू असताना अचानक असे काय घडले की, तिने पोटच्या दोन्ही मुलींची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केली. याचा तपास आता पोलिसांकडून सुरु आहे.