पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात घडलेली घटना धक्कादायक आहे. आधी प्रेमसंबंध आणि आईने लेकासोबत तिच्याच प्रियकराची हत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. प्रियकराकडून होणाऱ्या सततच्या मारहाणी आणि मानसिक-शारीरिक त्रासाला कंटाळून तिने आपल्या मुलाच्या आणि त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराची निर्घृण हत्या केलीय.
नेमकं प्रकरण काय ?
उषा नानासाहेब चव्हाण (वय ४०, विवाहित, चाकण) आणि मुंजा धोंडीबा नरहरे (वय २५, गंगाखेड) यांच्यात गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, प्रेमाचे रूपांतर भांडणात तसेच शारीरिक अन मानसिक तणावात झाले. गेल्या काही महिन्यांपासून मुंजा उषाला मारहाण करत होता. तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. असा आरोप आहे. याच सततच्या त्रासाला कंटाळून उषा चव्हाणने पुण्यात कामासाठी आलेल्या तिच्या मुलाकडे निखिल नानासाहेब चव्हाण (वय २१) याबाबत तक्रार केली.
नंतर उषा स्वतः चाकण येथे मुलाकडे गेली. प्रियकराकडून होणाऱ्या छळाची माहिती मिळाल्यानंतर उषा आणि निखिल यांनी मुंजा नरहरेची हत्या करण्याचा कट रचला. या कटात निखिलचा मित्र स्वप्नील नरहरी पारधीलाही सामील केले गेले. ७ जानेवारी रोजी उषा चव्हाणने मुंजाला चाकणमध्ये भेटण्यासाठी बोलावले. गंगाखेड येथून मुंजा चाकणला आल्यानंतर निखिल आणि स्वप्नील यांनी दुचाकीने त्याला सोबत घेतले. त्यानंतर तिघांनी खराबवाडी परिसरातील एका मद्यविक्री दुकानातून दारूच्या बाटल्या खरेदी केल्या आणि बिरदवाडी येथील ओढ्याजवळील एका एकांत, निर्मनुष्य ठिकाणी दारू पार्टी सुरू केली.
दारू पित असतानाच निखिल आणि स्वप्नील यांनी मुंजावर कोयत्याने प्राणघातक वार केले आणि त्याची क्रूर हत्या केली. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला. ही घटना घडल्यानंतर ११ जानेवारी रोजी त्या परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती उत्तर चाकण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील कंपन्यांमधील कामगारांची चौकशी आणि स्थानिक लोकांशी झालेल्या संवादाच्या आधारे तपास पुढे नेला.
पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करताना घटनास्थळी सापडलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि सिगारेटच्या ठिपक्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी या पुराव्यांच्या आधारे खराबवाडी परिसरातील मद्यविक्री दुकानांमध्ये चौकशी केली. तेथून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटली आणि २० दिवसांच्या अथक तपासानंतर उषा चव्हाण, निखिल चव्हाण आणि स्वप्नील पारधी या तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि इतर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडालीय.