राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महापालिका निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. अशात पक्षांतरे आणि राजीनामे देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. निष्ठावंतांचं तिकीट ऐनवेळ कापलं गेल्यामुळे सर्वच पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. दरम्यान, सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
सोलापुरात शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठी बंडाळी पहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या विरोधात १०० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शहरप्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. “जिल्हाप्रमुख अजय दासरी हटाव शिवसेना बचाव” असा नारा देत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राजीनामा दिला आहे.
अजय दासरी यांनी पक्षातील तिकीट विकले आहेत, असा आमचा आरोप आहे. मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही राजीनामे देत आहोत. जोपर्यंत अजय दासरी यांना हटवलं जात नाही, तोपर्यंत आम्ही पदावर काम करणार नाही. आम्ही कट्टर शिवसैनिक असूनही, आम्हाला डावलून, उपऱ्या शिवसैनिकांना पक्षात घेऊन तिकीट दिले असा आरोप यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.
त्यामुळे आता सोलापुरात शिवसेना ठाकरे गट मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.