आज दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी शरद पवार यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान यावेळी बोलताना बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.
मराठी मानसाने अटकेपार झेंडा फडकवला आहे. मराठी संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले याचा आनंद आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मोदींनी जी भुमिका घेतली ती महत्वाची आहे. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. त्यानंतर आता दिल्लीतील ७० वर्षानंतर या संमेलनाची पुनरावृत्ती होत आहे.
नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी लगेच होकार दिला. मला गुरूस्थानी असलेले यशवंत राव चव्हाण उत्तम साहित्यिक होते, त्यामुळे मी सुद्धा उत्तम लिहिता झालो. इतकी संमेलनं झाली, माञ केवळ चार महिलांनाच संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं. तारा भवाळकर यांना संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं हे आनंददायी आहे. दिल्ली आणि महाराष्ट्राचे एक नातं आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, साहित्य क्षेत्रात अनेक भगिनींनी भर घातली आहे. साहित्य संमेलन म्हटलं की राजकारण्यांचा इथे काय संबंध अशी चर्चा सुरू होते. राजकारण आणि साहित्य यांच्यातील संबंध जवळचा आहे. सध्या संवाद कठीण आणि नाजूक परिस्थिती मधून जात आहे. त्यामुळे आता साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे. संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.